सांगली विषयी

सांगली जिल्हा महाराष्ट्र पश्चिम भागातील एक जिल्हा. क्षेत्रफळ ८,६५६ चौ. किमी. महाराष्ट्र एकूण भूक्षेत्राच्या २·८०% क्षेत्र या जिल्ह्याने व्यापले आहे. लोकसंख्या २८,२०,५७५ (२०११). अक्षवृत्तीय विस्तार १६° ४५' उ. ते १७° २२' उ अक्षांश.रेखावृत्तीय विस्तार ७३° ४२' पू. ते ७५° ४०' रेखांश. पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी. व दक्षिण-उत्तर रुंदी ९६ किमी.पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सांगली जिल्ह्याचे स्थान असून त्याच्या उत्तरेस सातारा व सोलापूर जिल्हे, पूर्वेस कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा, दक्षिणेस कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटक राज्यातील विजापूर व बेळगाव जिल्हे तर पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा आहे. अगदी पश्चिमेकडील १२·८७ किमी. लांबीची सह्याद्रीची नैसर्गिक सरहद्द जिल्ह्याला लाभली आहे. सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव असे एकूण दहा तालुके आहेत. सांगली (लोकसंख्या २,५५,२७०–२०११) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.
सांगली या नावाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पहिल्या मतप्रवाहानुसार या ठिकाणी कृष्णा नदीच्या काठावर सहा गल्ल्या होत्या. त्यावरून त्यास सांगली हे नाव पडले असावे. दुसऱ्या मतप्रवाहानुसार या ठिकाणी जे गाव होते त्याला कानडी भाषेत सांगलकी म्हटले जाई. मराठीमध्ये त्याचे सांगली झाले असावे. अन्य एका आख्यायिकेनुसार वारणा व कृष्णा या नद्यांचा संगम सांगली येथे होतो. संगम या शब्दाचा अपभ्रंश होऊन सांगली हे नाव पडले असावे.

इतिहास

प्राचीन इतिहास असलेल्या ह्या प्रदेशाने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल, मराठे आणि पटवर्धन संस्थानिक इत्यादींच्या राजवटी अनुभवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनोबत नेताजी पालकर यांनी १६६९ साली आदिलशहाकडून सांगली, मिरज व ब्रह्मनाळ जिंकून घेतले. थोरल्या माधवराव पेशव्यांनी १७७२ मध्ये गोविंदराव पटवर्धनांना मिरजेचा किल्ला आणि आजूबाजूचा बराच प्रदेश जहागीर म्हणून दिला. त्यावेळी सांगलीच्या जवळ असलेले हरिपूर हे सांगलीपेक्षाही मोठे गाव होते. त्यावेळी हरिपूरची लोकसंख्या २,००० तर सांगलीची लोकसंख्या फक्त १,००० होती. परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या मृत्यूनंतर पटवर्धन कुटुंबात अंतःकलह निर्माण झाल्याने मिरज जहागिरीची वाटणी झाली. त्यात मिरज सांगलीपासून अलग झाले. तत्पूर्वी सांगलीचा समावेश मिरज जहागिरीमध्ये होत असे. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमधील शिराळा तालुक्यातील बिळाशीच्या सत्याग्रहाची नोंद भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात झाली आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात संस्थानांचे विलिनीकरण करतेवेळी सांगली, मिरज व जत ही संस्थाने सातारा जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आल्याने तो जिल्हा आकारमानाने मोठा आणि प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा बनला होता. त्यामुळे १९४९ मध्ये तत्कालीन सातारा जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन उत्तर सातारा व दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. १९६० मध्ये काही फेरफार करून तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांप्रतच्या सांगली जिल्ह्यात करण्यात आले. १९६५ मध्ये मिरज व खानापूर तालुक्यांचे विभाजन करून कवठे महांकाळ व आटपाडी असे आणखी दोन तालुके नव्याने निर्माण करण्यात आले. तालुका पुनर्रचनेनुसार १९९९ मध्ये पलूस, तर २००२ मध्ये कडेगाव या तालुक्यांची नव्याने निर्मिती करण्यात आली.
चिंतामणराव पटवर्धन, दादासाहेब वेलणकर, क्रांतिसिंह नाना पाटील, वि.स. खांडेकर, विजय हजारे, विष्णुदास भावे, वसंतदादा पाटील इ. सांगली जिल्ह्यातील थोर व्यक्ती होत ज्या विठोजीराव चव्हाणांनी औरंगजेबाच्या छावणीवर अचानक हल्ला करून औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणून औरंगजेबाच्या उरात धडकी भरविली, ते विठोजीराव चव्हाण याच जिल्ह्यातील डिग्रजचे. पेशवाईच्या काळात या भागावर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. त्यांपैकी चिंतामणराव पटवर्धन यांनी या भागाचा चांगला विकास घडवून आणला. त्यांनी छोटी धरणे, बंधारे व ताली बांधून जलसिंचनाखालील क्षेत्र वाढविले. दुग्धोत्पादनासाठी विविध योजना आखल्या. ग्रामीण विकासासाठी ग्रामोद्योग योजना सुरू केली. श्री गजानन मिल सुरू करण्यासाठी दादासाहेब वेलणकर यांना प्रोत्साहन दिले, तर सांगली येथे साखर कारखाना सुरू करण्यास शिरगावकर बंधूंना मदत केली. शैक्षणिक संस्थांच्या विकासातही त्यांचे मोठे योगदान आहे. प्रसिद्घ देशभक्त, झुंझार नेते आणि प्रतिसरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र या खेड्यात झाला. प्रसिद्घ क्रिकेटपटू विजय हजारे हे सांगलीचेच. सुप्रसिद्घ मंगेशकर कुटुंबियांचे काही वर्षे वास्तव्य सांगली येथे होते.महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी वसंतदादा पाटील यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील पदमाळे हे होय.

भौगोलिक माहिती

जिल्ह्याच्या प्राकृतिक रचनेत बरीच विविधता आढळते. भूरचनेनुसार सांगली जिल्ह्याचे (१) पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश, (2) कृष्णा खोऱ्यातील सुपीक व सखल मैदानी प्रदेश आणि (3) पूर्वेकडील प्रदेश असे प्रमुख तीन प्राकृतिक विभाग पडतात. सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. यात शिराळा तालुक्याचा बराचसा भाग आणि वाळवा तालुक्याचा काही भाग येतो. जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर सह्याद्रीची मुख्य श्रेणी असून त्याची उंची सु.१,४६३ मी. आहे. याच भागात प्रचितगड किल्ला व त्याच्या दक्षिणेस ‘दक्षिण तिवरा घाट’ आहे. या घाटातून कोकणात जाण्यासाठी पाऊलवाट आहे. सह्याद्रीपासून आग्नेय दिशेत पसरलेल्या भैरवगड-कांदूर डोंगररांगा आहेत. या डोंगररांगांपासून आग्नेयीस, पूर्वेस व ईशान्येस अनेक कटक गेलेले आढळतात. सह्याद्रीपासूनच्या या संपूर्ण डोंगराळ प्रदेशाला आष्टा डोंगरमाला असे ही संबोधले जाते. या डोंगरमालांच्या आग्नेय भागात मल्लिकार्जुन डोंगर व संतोषगिरी आहेत. या प्राकृतिक विभागाचा उतार आग्नेयीकडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशाच्या पूर्वेस कृष्णा, वारणा व येरळा या नद्यांच्या खोऱ्यांचा सखल व सुपीक मैदानी प्रदेश आहे. या प्रदेशात वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यांचे काही भाग येतात. या भागांतून वाहणारी कृष्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. येथे तिचा प्रवाह सामान्यपणे वायव्य-आग्नेय असा आहे. शिराळा व वाळवा तालुक्यांच्या दक्षिण सरहद्दीवरून पूर्वेस वाहत येणारी वारणा तसेच उत्तरेकडून वाहत येणारी येरळा नदी या विभागात कृष्णेला मिळतात. या नद्यांमुळे हा प्रदेश बराच सुपीक बनला आहे.
पूर्वेकडील पठारी प्रदेश कृष्णा खोऱ्याच्या उत्तरेस, ईशान्येस व पूर्वेस आहे. कृष्णा काठच्या प्रदेशापेक्षा हा भाग अधिक उंचीचा व सपाट आहे. या पठारी प्रदेशात कवठे महांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, तासगाव, मिरज या तालुक्यांचा काही भाग येतो. या पठारी प्रदेशात काही डोंगर आहेत; परंतु ते फारसे उंच नाहीत. मिरज तालुक्याच्या आग्नेय भागातील दंडोबाचा डोंगर, वाळवा व पलूस तालुक्यांच्या उत्तरेकडील मच्छिंद्रगड-कमळभैरव डोंगर, कडेगाव तालुक्यातील वर्धनगड डोंगररांगा, तासगाव तालुक्याच्या उत्तरेकडील होनाई डोंगर, आटपाडी तालुक्यातील शुक्राचार्याचा डोंगर, कवठे महांकाळ तालुक्यातील आडवा डोंगर या येथील प्रमुख डोंगररांगा आहेत. या पठारी प्रदेशातील डोंगररांगा कृष्णा व भीमानदीखोऱ्यांच्या दरम्यानचा जलविभाजक ठरल्या आहेत. सांगली जिल्ह्याच्या अगदी पूर्वेकडील प्रदेश सपाट माळरानाचा आहे. या प्रदेशात जत व आटपाडी तालुके आणि कवठे महांकाळ तालुक्याचा पूर्व भाग येतो.
सांगली जिल्ह्यात जांभी, पिवळसर, तांबूस, तपकिरी, करडी व काळी अशा विविध प्रकारच्या मृदा आढळतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषतः शिराळा तालुक्यातील जास्त पावसाच्या प्रदेशात जांभी, पिवळसर-तांबूस, तपकिरी मृदा; कृष्णा, येरळा व वारणा नद्यांच्या खोऱ्यांत काळी कसदार मृदा; वाळवा, मिरज व तासगाव तालुक्यांच्या काही भागांत करड्या रंगाची तर पूर्वेकडील कमी पावसाच्या प्रदेशात हलक्या पोताची व क्षारयुक्त मृदा आढळते. शिराळा तालुक्यात बॉक्साइटचे साठे असून अनेक ठिकाणी चुनखडक आढळतो.

महत्त्वाची स्थळे

सांगली, मिरज, शिराळा, देवराष्ट्रे, तासगाव, किर्लोस्करवाडी, औदुंबर, नरसिंगपूर ही जिल्ह्यातील महत्त्वाची स्थळे आहेत. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण सांगली हे कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. सांगलीची हळद, गूळ, शेंगा यांची बाजारपेठ, गणेशदुर्ग, गणेश मंदिर इ. उल्लेखनीय आहेत. मिरज हे महत्त्वाचे रेल्वे प्रस्थानक असून येथील भुईकोट किल्ला व मीरासाहेबांचा दर्गा प्रसिद्घ आहे. तंतुवाद्य निर्मितीच्या परंपरागत उद्योगासाठी हे प्रसिद्घ आहे. मिरजचे हवामान शुद्घ, कोरडे व आरोग्यदायी मानले जाते. अनेक दवाखाने व रूग्णालये येथे आढळतात. बत्तीस शिराळा हे शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण असून नागपंचमीला येथे भरणाऱ्या यात्रेमुळे हे विशेष प्रसिद्घीस आले आहे. दरवर्षी नागपंचमीत येथे जिवंत नागांची मिरवणूक काढली जाते व ते अंगाखांद्यांवर खेळविले जातात. हल्ली त्यावर बंदी घालण्यात आली आहे.कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे हे गाव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्घीस आले. याच्या आसमंतात पसरलेले सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्घ आहे. तासगाव येथील गणेश मंदिराचे गोपुर प्रेक्षणीय आहे. औदुंबर हे दत्तस्थान पूर्वीपासून विशेष प्रसिद्घ आहेत.कृष्णा-वारणा नद्यांच्या संगमावर वसलेल्या हरिपूर येथे संगमेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. बागणी येथील भुईकोट किल्ला उल्लेखनीय आहे, येथे पीरचा दर्गा असून मोठा उरूस भरतो. कवठेएकंद येथील श्री सिद्घराम मंदिर प्रेक्षणीय आहे.
याशिवाय मिरज व कवठे महांकाळ तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या दंडोबा डोंगरावरील शिवमंदिर, ब्रह्मनाळ येथील कृष्णा-येरळा नद्यांच्या संगमाजवळील महादेव मंदिर, वाळवा तालुक्यातील बहे येथील रामलिंग मंदिर, किल्ले मच्छिंद्रगड येथील नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथांची समाधी, खानापूर तालुक्यातील रेणावी येथील रेवणसिद्घ समाधी, भिवघाटनजीक असलेली शुकाचार्यांची समाधी इ. धार्मिक स्थळे उल्लेखनीय आहेत. वारणा नदीवरील चांदोलीधरण आणि सभोवतालचे चांदोली अभयारण्य पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे.

क्रीडा संकुल